| |
मुंबई विद्यापीठाचा अंदाधुंद
कारभार.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाचे पीतळ उघडे पाडले आहे.
मनविसेने या अंदाधुंद कारभाराची चित्रफितच काढली आहे. ज्यात विद्यापीठ खुलेआम विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे
( व्हिडिओ पहा ).
३१ जानेवारी २००९ रोजी साईंनाथ दुर्गे ( मनविसे उपाध्यक्ष ) मुंबई विद्यापिठाच्या परीक्षा भवनात गेले जेथे उत्तरपत्रिकांची तपासणी चालू होती. त्यांना आत जाताना विद्यापिठाच्या कोणत्याही अधिकारयाने मज्जाव केला नाही. त्यांनी आत जाउन उत्तरपत्रिका चाळल्या. त्यांच्यासमोर एम.सी.ए (सत्र पहिले) व पी.ई.एम् च्या उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्या, यातल्याच काही उत्तरपत्रिका साईंनाथ आपल्या सोबत घेऊन परीक्षा भवनाच्या इमारती मधून बाहेर आले. यानंतर मनविसेने विद्यापीठ आधिकारयांवर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली व तेंव्हाच संबंधितांच्या लक्षात आले की त्यानी एक अक्षम्य गुन्हा केला आहे.
हे कमी की काय म्हणुन, मनविसेने जेंव्हा उत्तरपत्रिका परत केल्या तेंव्हा विद्यापिठाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापिठाच्या शिक्क्यासहित पोचपावती दिली.
विद्येचे माहेरघर समजल्या जाणारया देशातील नामवंत आणि आदरणीय अशा मुंबई विद्यापिठात ही अशी घटना होणे लज्जास्पद आहे. कोणीही व्यक्ति परीक्षा भवनात जाऊन उत्तरपत्रिका घेऊन राजरोस पणे बाहेर येणे हे म्हणजे विद्यापिठाच्या यंत्रणेचे धिंडवडे काढल्यासारखेच आहे. एक विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर मेहनत करतो आणि त्याची मेहनत अशा काही बेजबाबदार हातात दिली जाते.
विद्यापिठाच्या या अंदाधुंदी कारभाराची जाणीव नसलेल्या सर्व विद्यार्थ्यानी याच्या विरोधात एकत्र यावे असे आम्ही आवाहन करतो तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन कुलगुरु व प्र-कुलगुरु यानी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो.
|